गडचिरोली : ‘१२-चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
एप्रिल २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कल्पना नीळ या उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘१२-चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी यापूर्वीच लागू झाली असून, आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे करण्यात येणार आहे. मतदारांनी दारु, पैसे किंवा कोणत्याही स्वरूपातील भेटवस्तू अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे.’
नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक महिला विशेष मतदान केंद्र राहणार आहे. मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित केले जात असून, यामध्ये ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनसंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात १९५० हा टोलफ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे ॲपही उपलब्ध केले आहे. महिलांना तसेच अपंग व्यक्तींना मतदानाचा हक्क बजावता यावा यावर भर देण्यात येत असून, मतदानासाठी दिव्यांग व्यक्तींनी वाहनाच्या मदतीची मागणी केल्यास त्यानुसार ते पुरविण्यात येईल, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
एकूण सात लाख ६९ हजार ७४६ मतदार असून, यामध्ये तीन लाख ९० हजार ९४६ पुरुष मतदार, तर तीन लाख ७८ हजार ४९८ महिला मतदार आहेत. मतदान केंद्राची संख्या ९३० असून, ग्रामीण भागात ७७७, तर शहरी भागात १५३ मतदान केंद्र असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.